बाबा रामदेवांचे आंदोलन सरकारने मोडून काढले. कारण काय तर रामदेव बाबा मोठे ‘ठग’ आहेत. जर रामदेव बाबा ठग असतील तर त्यांना भिण्याची काय गरज? सरळ त्यांना तुरुंगातच टाका ना! त्यांना भेटण्यासाठी तीन-तीन मंत्री पाठवण्याची काय गरज? आणि रामदेव बाबा ठग का ? तर ते कुणाचे तरी हस्तक आहेत. त्यांनी उचललेले मुद्दे कितीही प्रामाणिक असले तरी ते राजकारण करू पाहत आहेत म्हणून त्यांना उपोषण वगैरे करण्याचा अधिकारच नाही. देशात कितीही भ्रष्टाचार होत असला तरी त्यावर बोलण्याचा विरोधकांना काय अधिकार? तो अधिकार फक्त सरकारलाच आहे. केवळ परदेशात कुणा कुणाची संपत्ती आहे? हेच सांगण्याची सरकारची हिम्मत नसेल तर मग लोक काय फक्त नशिबालाच दोष देत बसणार आहेत? ( सरकार हे कसे विसरले कि हे रामदेव नसते तर दुसरे रामदेव उभे राहिले असते.) आगोदर अमाप संपत्ती जमा करावयाची आणि कुणी म्हणाले “यांच्याकडे बेकायदेशीर संपत्ती आहे” तर तुझ्याकडे किती आहे त्याची चौकशी करतो म्हणून धमकी द्यावयाची. या धमकीने आपला प्रामाणीकपणा तर सिद्ध होत नाही ना! रामदेव बाबांना ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप, असेच तर सरकारला म्हणायचे आहे.
सरकार म्हणते रामलीला मैदानावर उपोषण करण्याची परवानगी रामदेव बाबांना नव्हती. रामदेव बाबांनी भक्तांना फसवले. सरकार खरोखरच प्रामाणिक असते तर त्यांनी आगोदर रामदेव बाबांना रामलीला मैदान खाली करण्याची चेतावणी ( स्पीकर द्वारे) दिली असती. लोकांना रामलीला मैदान खाली करा असे सरकारने का सांगितले नाही? सरकार म्हणते रामदेव बाबांनी लिहून दिले होते कि मी उपोषण बंद करतो. रामदेव बाबांनी जर गुप्तता बाळगली असेल तर सरकारने तर गुप्ततेची शपथच घेतलेली होती! त्यांनी लोकांना का नाही सांगितले कि “आम्ही काळा पैसा आणण्यास तयार आहोत. तरीही रामदेव उपोषण सोडण्यास तयार नाहीत” अंधारात साटेलोटे करावयाचे आणि अंगलट आले कि बोंब मारावयाची. हाच का सरकारचा स्वच्च कारभार?
म्हणे रामदेव बाबांना धडा शिकविल्या नंतर आता आण्णा हजारेंना हात दाखवायचा आहे. हि काही चांगली लक्षने नाहीत. आण्णांची ताकद, प्रामाणिकपणा यांना काय कळणार? करून करून काय करणार? तर त्यांच्या संस्थांची चौकशी करणार. त्या बरखास्त करणार. आता हा म्हातारा भिण्याची शक्यता खुपच कमी आहे. म्हातारा एकदा जर उपोषणाला बसला आणि तेही निवडणुकांच्या काळात जर बसला तर हे सरकार भस्म करूनच सोडेल. मग बसा बोम्बलत यामध्ये जातीवादी शक्तींचा हात आहे म्हणून. आगोदर आपणच जातीवादाची लागवड करावयाची. झाड मोठे झाले कि दुसऱ्याच्या नावाने बोंब मारावयाची.
लोकांना कुणी वाली राहिलेला नाही. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी लोकांची गत झालेली आहे. कुनीही निवडून दिला तरी समस्या त्याच. त्या कधी दूर होणार नाहीत.
प्रा. बिडवे नारायण
परतूर.